
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर (पीटीआय): जवळपास दोनशे वर्षांपूर्वी भारताच्या सांस्कृतिक पायाभूत रचनेवर आघात करण्यासाठी मोहिम सुरू केलेल्या थॉमस मॅकॉलेने देशात रुजवून ठेवलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून भारताची सुटका करण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागरिकांना केले.
सहाव्या रमनाथ गोयंका व्याख्यानमालेत बोलताना मोदी म्हणाले की, मॅकॉलेने भारताच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पायाभूत रचनेविरुद्ध केलेल्या अपराधाला २०३५ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत.
“पुढील दहा वर्षांत मॅकॉलेने भारतावर लादलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वतःची सुटका करण्याचा निश्चय आपण सर्वांनी करायला हवा. ही दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत,” असे मोदी म्हणाले.
एखादे राष्ट्र स्वतःचा सन्मान करणे थांबवते तेव्हा ‘मेक इन इंडिया’सह त्याच्या स्थानिक व्यवस्थांना नाकारण्याची वेळ येते, असे त्यांनी म्हटले.
पर्यटनाचा उदाहरण म्हणून उल्लेख करताना मोदी म्हणाले की, जगातील प्रत्येक देश आपला इतिहास आणि वारसा यांचा अभिमान बाळगतो, पण स्वातंत्र्यानंतरच्या भारतात मात्र आपल्या वारशाला दूर सारण्याचा प्रयत्न दिसला.
“वारशाबद्दल अभिमान नसेल तर संरक्षणाची प्रेरणा राहत नाही; संरक्षण नसेल तर तो वारसा विटा आणि दगडांच्या भग्नावशेषांमध्ये बदलतो. पर्यटन वाढीसाठी वारशाचा अभिमान अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
स्थानिक भाषांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, स्वतःच्या भाषांचा अवमान करणारा दुसरा कोणता देश ऐकिवात नाही.
“जपान, चीन आणि दक्षिण कोरिया यांनी अनेक पाश्चात्य पद्धती स्वीकारल्या, पण कधीच आपल्या भाषांशी तडजोड केली नाही. त्यामुळेच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांतील शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
सरकारला इंग्रजी भाषेचा विरोध नसून भारतीय भाषांना ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मॅकॉलेने भारताचा आत्मविश्वास खच्ची करून हीनतेची भावना निर्माण केली, असे मोदी म्हणाले.
“विदेशी पद्धतीनेच प्रगती आणि महानता साध्य होऊ शकते, या विश्वासाची पेरणी त्या वेळी झाली. स्वातंत्र्यानंतर ही मानसिकता आणखी खोलवर रुजली,” असे त्यांनी म्हटले.
“भारताचे शिक्षण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक आकांक्षा अधिकाधिक विदेशी मॉडेल्सशी जोडल्या गेल्या. स्थानिक पद्धतीतील अभिमान कमी झाला. महात्मा गांधी यांनी रचलेला स्वदेशी पाया जवळजवळ विस्मरणात गेला. शासनाच्या पद्धती परदेशात शोधल्या जाऊ लागल्या आणि नवोन्मेषासाठीही परदेशाकडे पाहिले जाऊ लागले,” असे मोदी म्हणाले.
मॅकॉलेने भारतात आणलेल्या दुष्परिणामांना आणि सामाजिक विकृतींना पुढील दशकात संपवलेच पाहिजे, असा ठाम आग्रहही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
विभाग: ब्रेकिंग न्यूज
एस.ई.ओ. टॅग्स: #swadesi #News Rid India of Macaulay mindset in next 10 years: PM Modi
