
नवी दिल्ली, २८ जानेवारी (पीटीआय): संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनरेगा रद्द करणे आणि एसआयआर या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी बुधवारी घेतला.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कक्षात इंडिया आघाडीतील विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठीची रणनीती ठरवण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
नेत्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान तसेच अर्थसंकल्प सादर करताना आणि त्यावरील चर्चेदरम्यान आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
“मनरेगा पुनर्संचयित करण्यासाठी विरोधक सर्व लोकशाही मार्गांचा अवलंब करतील,” असे एआयसीसीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले.
राष्ट्रपतींच्या संयुक्त अधिवेशनातील भाषणादरम्यान विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी टीका करत याला लज्जास्पद म्हटले.
“आज विरोधकांनी केलेली कृती देशासाठी लाजिरवाणी आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगींना कधीही माफ केले जाणार नाही,” असे ते म्हणाले.
बैठकीला तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते उपस्थित नव्हते. बैठकीला राहुल गांधी, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे टी. आर. बालू, शिवसेना (उबाठा)चे अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता, सीपीआय(एम)चे जॉन ब्रिटास, सीपीआयचे पी. संदोष आणि आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन उपस्थित होते.
